नाशिकमध्ये रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनीही दोषींना कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

गंभीर घटना! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

राज ठाकरेंचं ट्विट
“ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं,” असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय झालं?
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णालयात १५० रुग्ण दाखल होते. यामधील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत
मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. छगन भुजबळ यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Nashik Oxygen Tank Leak: “निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?”

उच्चस्तरीय चौकशी होणार
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना केली असून यामध्ये एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. “ऑक्सिजन कसा लीक झाला याची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये एक इंजिनिअर देखील मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. याची चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. पण ते शोधणं गरजेचं आहे. त्यासाठी याची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत”, असं भुजबळ यांनी सांगितलं.

पोलिसांचा फौजफाटा –
दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. करोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस गर्दी कमी करत आहेत. याशिवाय संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. तसंच नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित आहेत