राज्यात सर्वांच लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून सध्या महाविकास आघाडी आणि भाजपा दोन्हीकडून आपण पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असून अनेक दावेही केले जात आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या उमेदवारांचं अभिनंदन केलं असून लवकर भेटण्यासाठी येणार असल्याचं म्हटलं आहे. “ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या,” असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३६ जागी विजय मिळविला आहे. दुसरीकडे २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा व शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असे दोन्ही गट आपण पहिल्या स्थानावर असल्याचा दावा करत आहेत. शिवसेना हा या निवडणुकांमध्ये ३,११३ जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, महाविकास आघाडीही भाजपाच्या पुढे असल्याचे शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र, भाजपाची अवस्था गिरे तो भी टांग उपर असल्याची टिप्पणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केली आहे. दुसरीकडे आपण पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा भाजपानं केला आहे.