खरीपातील सोयाबीनचं बियाणं वांझोटं निघाल्याच्या लातूर जिल्ह्यात तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. सोयाबीनचं बियाणं उगवलंच नसल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. यावरुन मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कृषी विभागाला आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने पाहिले नाही. मंगळवारी मनसे शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी सहसंचालकांचे कार्यालयच फोडले.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लातूर कृषी संचालक कार्यालयात तुफान राडा करत तोडफोड केली. या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी मनसेने केली आहे.

बारा कंपन्यांविरोधात गुन्हे
साडेआठ हजार क्विंटल बियाणे उगवले नाही. कृषी विभागामार्फत १२ कंपन्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. महाबीजने बियाणे बदलून देण्याची तयारी दाखवली आहे तर खासगी कंपन्यांनी पेरणीचा खर्च देण्याची तयारी दाखवल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असले तरी वस्तुस्थिती मात्र भिन्न आहे. खासगी कंपन्या भरपाई द्यायला तयार असतील तर तोच न्याय महाबीजला का नको? असा प्रश्न आहे.