केंद्र सरकारने करोना काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही असा आरोप केला होतो. आत्तापर्यंत ५ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे राज्याला दिले आहेत. मात्र केंद्राने काहीही दिलेच नाही असं ठाकरे सरकारकडून भासवलं जातं आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आत्तापर्यंत २८  हजार १०४ कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे. तरीही केंद्राने काहीही दिलं नाही असं भासवलं जातं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारला केंद्र सरकारनेच मदत केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने काय काय केलं?

महाराष्ट्रातून ६०० ट्रेन्स सोडल्या

श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी दिले

मजुरांच्या छावण्यांसाठी १ हजार ६११ कोटींचा निधी दिला

पीपीई आणि एन ९५ मास्क यांचा पुरवठा केला

शेतीसाठी ९ हजार कोटींचा निधी दिला

एप्रिल आणि मे महिन्याचा निधी आगाऊ दिला

गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत १७५० कोटींचा गहू, २६२० कोटींचा तांदूळ, १०० कोटींची डाळ दिली गेली

जनधन योजनेचे १३०८ कोटी दिले गेले

उज्ज्वला अंतर्गत १६२५ कोटी

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राला केंद्राकडून २ लाख ७० हजार कोटी मिळत आहेत, इतर राज्यं घेत आहेत मग महाराष्ट्र का नाही?

केंद्र सरकारने राज्याला १० लाख पीपीई किट्स दिल्या. तर १६ लाख N95 मास्कही दिले. याशिवाय वैद्यकीय साहित्य राज्याला खरेदी करता यावं यासाठी ४४८ कोटी दिले

पैसे नाहीत म्हणून शेतकरी, बारा बलुतेदार यांना मदत करणार नाही अशी ओरड करता येणार नाही. कर्नाटक, गुजरात आणि काँग्रेसशासित छत्तीसगडनेही ही मदत केली आहे

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत १७२६ कोटी केंद्र सरकारने दिले

दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी १६ कोटी रुपये दिले

केंद्राने कायद्यात बसत नसतानाही नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सगळे पैसे दिले.

महाराष्ट्रातून ६०० श्रमिक ट्रेन्स सुटल्या, प्रत्येक ट्रेनमागे केंद्राला ५० लाखांचा खर्च, राज्याने तिकिटांचे केवळ सात ते नऊ लाख खर्च केले