देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, दुसरीकडे अनेक ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणास लस तुटवड्यामुळे खंड पडत आहे. लसीचा पहिला डोस घेतलेले दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने १७ टक्के लोकांच लसीकरण झाल्याचं म्हटलं आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

“ केंद्र सरकारने १७% लोकांचं लसीकरण केल्याचं जाहीर केलं. पण लसीचे २ डोस किती लोकांना मिळाले? कोवॅक्सिन आणि सीरमने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तेवढी लस भारताला दिलीच नाही, मग या एवढ्या लसी आल्या कुठून? मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा.”, अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

तसेच, “आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने परवा जाहीर केलं की १७ कोटी लोकांना लस दिलेली आहे. अशा पद्धतीचा एक रिपोर्ट आलेला आहे. खरंतर दोन लस दिल्यानंतर लसीकरण प्रक्रिया पूर्ण होते. आता १७ कोटीमधील किती जणांना दोनदा लस मिळाली? हा एक प्रश्न आहे आणि १७ कोटी लस ही कुठून आणली आहे. कारण, जे काही पुनावाला जाहीर करतोय, त्याच्या हिशाबाने तर त्याने एवढी लस भारतला दिलेलीच नाही. मग ही लस आली कुठून? आपल्या देशाची समजा १३० कोटी लोकसंख्या असेल, तर २६० कोटी लस आपल्याला लागणार आहे व त्यात जर वाया जाणारी संख्या पकडली तर किमान ३० कोटी लशींचे डोस आपल्या देशाला हवे आहेत. आज तेवढ्या प्रमाणात लस आपल्याजवळ उपलब्ध नाही. पूनावालानी सांगितलं की २६ एप्रिलला आम्हाला केंद्र सरकारने ऑर्डर दिली आहे. म्हणजे त्यातही खोटं बोलण्याचं काम, या महामारीत तरी खरं बोला. सांगा लोकांना की आमचं चुकलेलं आहे, देशाची माफी तरी मागा ते देखील नाही करत आणि उलट आपलीच पाठ थोपटायची आणि सेंट्रल व्हिस्टामध्येच आनंदी रहायचं असं जर भाजपाचं असेल तर लोकं कधीही माफ करणार नाहीत.” असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

“राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसीतून ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस”

केंद्राकडून अपुरा साठा मिळाल्याने राज्यात सध्या ४५ वर्षांवरील सुमारे साडेपाच लाख नागरिक कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत. या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. राज्याने १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या २ लाख ७५ हजार मात्रांचा वापर दुसरी मात्रा देण्यासाठीच केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.