‘आपण कनिष्ठ जातीतले आहोत असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच करत आहेत. अन्यथा त्यांना ओबींच्या प्रश्नांशी काहीही घेणेदेणे नाही, असा खळबळजनक आरोप भाजपचे बंडखोर माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. ‘द हिंदू’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. गुजरात निवडणुकीत आता आपण भाजपविरोधात प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे या ही मागणी केली होती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर ओरडले होते. तसेच याची खरंच गरज आहे का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी त्यावेळी केला होता. ओबीसींना स्वतंत्र मंत्रालयाची गरज नसल्याचेही मोदी म्हटले होते असाही आरोप पटोले यांनी केला.

मोदी स्वतः ओबीसी समाजातून आल्याचा दावा करतात. मात्र, त्यांना ओबीसींच्या कल्याणाचे काहीही घेणेदेणे नाही. उलट त्यांच्या अशा वागण्यातूनच ते केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आपण कनिष्ठ जातीतले अर्थात ओबीसी असल्याचे सांगतात असा खळबळजनक आरोप पटेल यांनी केला.

राज्यातील फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अनेक अश्वासने दिली आणि त्यावर निवडणुका जिंकल्याही. मात्र, निवडून आल्याबरोबरच जनतेला दिलेली अश्वासने ते विसरले, असा आरोपही पटोले यांनी केला आहे.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदी स्वतः ‘चाय पे चर्चा’ या आपल्या निवडणूक कार्यक्रमादरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्रातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी भेट दिली होती. तसेच आपला पक्ष सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठीच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करु असे आश्वासन दिले होते. तसेच शेतमालाला दीड पट जास्त हमीभाव देऊ असेही ते त्यावेळी म्हणाले होते.

या आश्वासनांच्या जोरावर ते सत्तेत आले मात्र, त्यानंतर सरकारने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन सरकार स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करु शकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. यावरुन मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप पटोले यांनी केला.

मागील तीन वर्षांच्या कालावधीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण ३४ टक्के वाढले आहे. या आत्महत्या थांबाव्यात यासाठी आपण लोकसभेत तसेच पक्षाच्या व्यासपीठावरून आवाज उठवला होता. त्यानंतर गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठकही झाली होती. यावेळी आपण काही शेतकऱ्यांबाबत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. मात्र, त्यावर पंतप्रधान माझ्यावर रागावले होते. दरम्यान, ओबींसींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले तर पंतप्रधान पुन्हा माझ्यावर नाराज झाले होते. त्याचवेळी निराशेतून पक्ष सोडण्याबाबत माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. त्यानंतर मी पुन्हा मच्छिमारांचे प्रश्न, बंद होत असलेले उद्योग-धंदे, नोटाबंदी आणि जीएसटीचे झालेले वाईट परिणाम यांवर भाष्य केले. मात्र, सरकारने या सर्व प्रश्नांची कधीच दखल घेतली नसल्याचे पटोले यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.