दंगलीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर अपंगत्व आलेल्यांच्या कुटुंबियांना तीन लाख रुपये सहाय्य करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. आझादनगर पोलीस ठाण्याचे विभाजन आणि दोषी व्यक्तिंवर प्रसंगी मोक्का लावण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.सहा जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत सहा जणांचा बळी तर, पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले. वातावरण काहीसे निवळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री सुरेश शेट्टी यांसह धुळ्याला भेट दिली. मात्र, प्रत्यक्ष दंगलग्रस्त भागाला भेट न देता मुख्यमंत्र्यांनी विश्रामगृहात अधिकारी आणि राजकीय नेते तसेच शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या वेळी दंगल आणि शासनाची उपाययोजना तसेच संभाव्य कारवाईची माहिती त्यांनी दिली.
‘त्या’ पोलिसांवरही कारवाई   पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप काही जणांकडून करण्यात येत आहे. आपणांस मोबाइलव्दारे केलेले काही चित्रीकरणही दाखविण्यात आले. त्यात पोलीस गणवेशातील व्यक्ती दुचाकीची तोडफोड करत असल्याचे दिसते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ही व्यक्ती जर पोलीस असेल तर त्याच्या बडतर्फीची तयारी दर्शविली.