नैर्ऋत्य मान्सूनने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आणि त्याने पुढे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला. त्याच्या प्रभावामुळे मुख्यत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला. पुढाल दोन दिवसांतही पाऊस सक्रिया राहण्याची शक्यता वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे. मुंबईत कुलाबा येथे सोमवारी सायंकाळपर्यंत ५८ मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे ६२ मिलिमीटर पाऊस पडला.
मान्सूनचे वारे सक्रिय असल्याने त्यांचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात पावसाचे प्रमाणही चांगले आहे. त्याने रविवारी राज्याचा बहुतांश भाग व्यापला होता. त्यानंतर सोमवारीसुद्धा पुढे सरकून त्याने संपूर्ण राज्य व्यापले. आता मान्सूनची उत्तर सीमा गुजरातमधील ओखा, अहमदाबाद, मध्य प्रदेशमधील पचमढी, अंबिकापूर, झारखंडमध्ये रांची, ओरिसामध्ये बेहरामपूर, पश्चिम बंगालमध्ये जलपैगुडी व सिक्कीममध्ये गंगटोक येथून जात होती. तो सक्रिय असल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत महाराष्ट्रात पडलेला पाऊस असा (मिलिमीटरमध्ये)- मुंबई कुलाबा ५८, सांताक्रुझ ६०, अलिबाग ३१, रत्नागिरी ५९, डहाणू ४, भीरा ३६, पुणे २.६, नगर १४, कोल्हापूर २१, सातारा ५, सांगली ४, महाबळेश्वर ६२, नागपूर १. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांतही मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.