प्रबोध देशपांडे, अकोला विदर्भात दुष्काळात होरपळणाऱ्या बुलढाणा जिल्हय़ात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. सन २०१८ मध्ये आत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ांमध्ये एक हजार १४२ आत्महत्या झाल्यात. त्यापैकी बुलढाणा जिल्हय़ातील आकडा ३१२ आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. त्यावर मात करत शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतो. त्यालाही कुठे तरी मर्यादा येतात आणि परिस्थितीपुढे हतबल होऊन तो आत्महत्या करतो. विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम व वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये २००१ पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्या थांबाव्या म्हणून विशेष पॅकेज व अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने आत्महत्या सुरूच आहेत. एकेकाळी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्य़ात झाल्याची नोंद होती. २०१४ पासून बुलढाणा जिल्हय़ात आत्महत्या वाढत आहेत. मागील दोन वर्षांत प्रत्येकी ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शासनाचे अपयश कारणीभूत शेतकरी सर्व बाजूने संकटात आहे. त्याच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून कुठलेही प्रयत्न होत नाही. उलट शेतकऱ्यांची अक्षरश: छळवणूक सुरू आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. बुलढाणा जिल्हय़ात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणे ही अत्यंत खेदाची बाब असून, यावर तात्काळ उपाययोजना करावी. - दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार, खामगाव.