शेतातून परत येत असताना गावालगत नाला ओलांडताना अचानक आलेल्या पुरात आईसह एक मुलगी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दिग्रस तालुक्यातील आरंभी येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. आज बुधवारी सकाळी गावालगत दोघींचेही मृतदेह आढळून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, कविता किशोर राठोड (वय ३६) आणि निमा किशोर राठोड (वय १६) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी एका शेतात मजुरीकरीता गेलेल्या कविता व निमा या दोघी सायंकाळी घरी परत येत असताना गावालगतच्या नाल्यास पूर आलेला होता.

दरम्यान, नाला ओलांडताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने त्यात दोघीही वाहून गेल्या. ही घटना गावात कळताच गावकऱ्यांनी शोधमोहीम राबविली. मात्र, रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. आज बुधवारी सकाळी ७ वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू केली तेव्हा दोघींचेही मृतदेह चिरकुटा गावानजीक एका शेतात आढळले.

दिग्रसचे तहसीलदार, ठाणेदार आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता दिग्रस ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले.