कौटुंबिक वादातून एका महिलेने पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड गावात गुरूवारी सांयकाळी हा प्रकार घडला. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्यामल गणेश यरकळ (वय २८, रा. पिसोरेखांड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात झालेला वादाचा राग मनात धरून श्यामल यांनी हा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे. श्यामल यांनी तीन वर्षाच्या आराध्याला आणि दुसऱ्या मुलीला विष पाजले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. गंभीर अवस्थेत असलेल्या दोन्ही मुलींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण आराध्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरी मुलगी अस्वस्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.