प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावरुन पडून मृत्यू झाला आहे, ते ६० वर्षांचे होते. काल (शनिवारी) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रॅपलिंग करताना तोल गेल्याने कड्यावरुन ते दरीत कोसळले. त्यांच्यासोबत ३० जणांची टीमही अडकून होती. या दुर्घटनेची माहिती कळताच बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी सावंत यांचा मृतदेह बचाव पथकाला आढळून आला. गोरेगाव येथील ते रहिवासी होते. अरुण सावंत हे त्यांच्यासोबत रॅपलिंगसाठी आलेल्या ३० जणांच्या टीमचे नेतृत्व करीत होते. दोर लावत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले. यानंतर त्यांच्या टीममधील काही जणांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर सावंत यांचा शोध घेण्यासाठी मुंबई, पुणे आणि लोणावळा येथून पाच रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रविवारी त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला. लोणावळा येथील ड्युक्स नोज आरोहण १९८५ च्या मोहिमेत ड्युक्स आरोहण करणारे ते पाहिले गिर्यारोहक ठरले होते. त्यानंतर गिरीमित्र संमेलन २००८ वेळी त्यांचा गिरीमित्र गिर्यारोहक सन्मानाने गौरवण्यात आले होते. गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अल्पपरिचय. अरुण सावंत यांच्या डोंगरभटकंतीला १९७५ पासून सुरुवात झाली. त्यांच्या या भटकंतीला गिरिविहारच्या १९७९ मधील प्रस्तावरोहण शिबिरामुळे दिशा मिळाली. त्यानंतर १९८० साली त्यांनी WHMI येथून गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स पूर्ण केला. गिरिविहार आणि हॉलिडे हायकर्सच्या माध्यमातून त्यांनी फ्रेंडशिप, लडाख, मनाली, क्षितीधर, सैफी, भागीरथी या हिमालयातील मोहिमांमध्ये भाग घेतला. पण त्यांचा ओढा कायमच हिमालयापेक्षा सह्याद्रीकडेच राहिला. १९८४ पासून गिर्यारोहणाच्या त्यांच्या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये त्यांनी तुंगी, माहुली, भटोबा, तैलबैलाची भिंत, हरिश्चंद्र ग़डाजवळील शेंडी सुळका, कळकराय, भिव्याची काठी असे अनेक सुळके सर केले. त्यानंतर त्यांचे नाव ठळकपणे पुढे आले ते ड्युक्सनोज (नगफणी) सुळक्यावरील पहिल्याच यशस्वी चढाईमुळे. तब्बल ८०० फुटांच्या या सुळक्यावर त्यांच्याद्वारे पहिलेच यशस्वी आरोहण झाले होते. कोकणकड्यावरील मृतदेह स्वतः बाहेर काढला होता ज्या कोकणकड्यावरुन कोसळून अरुण सावंत यांचा मृत्यू झाला आहे. त्याच कोकणकड्यावर १९८६ साली घटलेल्या एका दुर्घटनेत सावंत यांनी भर पावसात अजस्त्र कोकणकड्यावरुन रॅपलिंग करुन कड्याखालील मृतदेह खाली आणला होता. गिर्यारोहणाचे कौशल्य आणि अनुभवाचा त्यांनी बचाव मोहिमेसाठी अनेकदा वापर केला.