पंधरा लाख रुपयांचे दिलेले आश्वासन हे विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी म्हंटले नव्हते किंवा जाहीरनाम्यातही लिहिलेले नव्हते, असे अजब विधान राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या ४ वर्षाच्या कालावधीत सरकारने जनतेसाठी काय केले? हे सांगण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांची एक व्हिडीओ मधल्या काळात व्हायरल झाली होती. त्यात मोदी नागरिकांना १५ लाख रुपयाबाबत सांगत असल्याचे ते भाषण होते. याबाबत एका मुलाखतीत प्रश्न विचारले असता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अमित शहा यांनी तो एक 'जुमला' असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांच्यावरही टीकेची झोड उठली होती. मात्र याबाबत बोलताना खा. साबळे म्हणाले की प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपयांचे दिलेले आश्वासन हे विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे. जाहीरनाम्यात असे लिहिलेले नव्हते किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे म्हटले नव्हते. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करणे, द्वेषभावना निर्माण करणे हे काम विरोधक आणि काँग्रेस करत आहे, असाही आरोप त्यांनी केला. तसेच, मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत राबवलेल्या विविध योजनांचा फायदा देशातील २२ कोटी गरिबांना झाला आहे. त्यामुळे लोकाभिमुख सरकार कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आ. महेश लांडगे आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.