डॉ. सुब्रमण्यम यांच्याकडून उद्धव ठाकरेंची प्रशंसा

पालघर : दिल्लीतील शाईनबाग परिसरातील आंदोलकांना तुगलकाबाद परिसरामध्ये स्थानबद्ध केले असते तर दिल्लीमध्ये घडलेला भयंकर प्रकार टाळता आला असता. सरकारने आंदोलकांना ढील दिल्याने त्याचा गैरफायदा घेतल्याचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पालघर येथे प्रतिपादन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र विरोधकांना वेळीच स्थानबद्ध केल्याने त्यांची त्यांनी प्रशंसा केली.

विराट हिंदुस्तान संगमतर्फे आयोजित ‘जागृत पालघर, जागृत भारत’ अभियानअंतर्गत ‘भारतीयतेची ओळख’ या विषयावर खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे पालघर येथे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी मिशन शूरपारकी-पालघरचे पौराणिक सत्य याचा लोकार्पण सोहळा तसेच पालघरजवळील धुकटन या गावाला दत्तक घेतल्याने त्या गावातील काही कामांचे भूमिपूजन खासदार डॉ. स्वामी यांच्या हस्ते आज करण्यात आले.

पालघर येथील जाहीर सभेत संबोधित करताना सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत विरोधकांकडून पसरवल्या जात असलेल्याअफवा व गैरसमजाची माहिती देऊन या कायद्याविषयी गेल्या तीन-चार वर्षांत झालेल्या वाटचालीची स्वामी यांनी माहिती दिली. देशातील अर्थ प्रणाली सध्या संकटात असली तरीसुद्धा त्यावर मात करून देश महाशक्ती बनू शकते हे पूर्वानुभव आधारित यांनी प्रतिपादन केले. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी त्यांना बाजारपेठ निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

फारूक अब्दुल्ला यांना योग्यवेळी सोडू

काँग्रेस राज्यकर्त्यांनी शेख अब्दुल्ला यांना सतरा वर्षे नजरकैदेत ठेवले होते, त्याउलट फारूक अब्दुल्ला यांना अजुनी नजरकैदेत ठेवून सतरा महिने झाले नसल्याचे सांगत, योग्य वेळ आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येईल असे सांगितले.