खासदार सुनील मेंढे यांचा सवाल गोंदिया : भंडारा जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी महापूर येऊन गेला. होत्याचे नव्हते झाले. शेतकरी झालेल्या नुकसानीने गर्भगळीत झाला. त्यावेळी मुख्यमंत्री सोडा शासनातील एक दोन अपवाद वगळता कोणालाही धीर देण्यासाठी यावे वाटले नाही. मात्र आज पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या परिस्थितीनंतर सर्वजण तिकडे धावू लागले आहेत. मुख्यमंत्री गेल्या सात महिन्यांपासून खऱ्या अर्थाने माझे घर माझी जबाबदारी या भूमिकेत राहिले आहेत. परंतु पश्चिम महाराष्ट्रात पाहणी करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेत त्यांनी एकाच्या राज्यातील दोन वेगवेगळ्या प्रदेशांना सापत्न वागणूक देत असल्याचे त्यांनी दाखवून दिले असल्याचा आरोप भंडारा, गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या महापुराने संपूर्ण नुकसान झाले. घरे पडली. अजूनही बाधितांना शासनाकडून मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी पूर्व विदर्भाचा दौरा करून संकटात सापडलेल्यांना धीर देणे गरजेचे होते. परंतु ते सौजन्य मुख्यमंत्र्यांकडून दाखविले गेले नाही. मागील सहा महिन्यांपासून फक्त स्वत:च्या घरात बसून असलेल्या मुख्यमंत्र्यांना आता मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पूर्ण पीडितांच्या दु:खाची जाणीव झालेली दिसते. पवार कुटुंबातील सदस्य पाहणी करून आल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करणार, असे जाहीर केले आहे. पूर पीडितांच्या बाबतीत हेच सौजन्य पूर्व विदर्भाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दाखविणे अपेक्षित होते. परंतु ते त्यांनी केले नाही.