रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी आपल्या विरोधात दिलेला हक्कभंग प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करणार आहेत.

आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात खासदार तटकरे आपल्याला निमंत्रित न करता कार्यक्रम घेतात, अशी आमदार कदम यांची तक्रार आहे. या मुद्यावर खासदार तटकरे यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

या अभूतपूर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना खासदार तटकरे म्हणाले की, मी जिल्हा परिषद अध्यक्ष, पाच वेळा आमदार व आता संसद सदस्य अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम केले आहे.  मात्र माझ्यामुळे राज्यातील सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमजाचा संदेश जाता कामा नये. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष पटोले यांनी हा हक्कभंग तातडीने स्वीकृत करावा, अशी विनंती मी करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमध्ये मला संसद सदस्य म्हणून बैठक बोलावण्याचा अधिकार आहे की नाही, ते त्यांनी तपासून पाहावे. या प्रस्तावावर अध्यक्षांनी मला नोटीस काढावी. मी त्याला उत्तर देणार नाही.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे टिकलेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. म्हणूनच हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेऊन माझ्यावर काही कारवाई करायची असेल तर करण्यात यावी. महाराष्ट्रात भक्कमपणे सरकार पाच वर्षे भक्कमपणे टिकवायचे आहे. त्यामुळे हे महान देशभक्त दुर्देवाने त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत आहेत. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही असाही टोमणा तटकरे यांनी मारला.