रामराजे आणि आमचे बंधू शिवेंद्रसिहराजे यांचे संगनमत झाले असून माझ्याबद्दल ते चुकीचे आरोप करत आहेत. मी पाणी प्रश्‍नाबाबत योग्य तेच आणि लोकहिताच्या दृष्टीने बोललो होतो. त्यांना पक्षातून कुठे जायचे असेल तर त्यांनी जावे, त्यासाठी मला जबाबदार धरू नये. पक्षांतरासाठी त्यांची कुठेतरी सेटिंग झाली असेल, असा आरोप खा. उदयनराजे भोसले यांनी केला.

पाणी प्रश्नावरून मी काहीही चुकीचे बोलत नसून घटनेने मला जो बोलण्याचा अधिकार दिला आहे, त्यानुसार मी बोलत आहे. मी आता घटनेच्या प्रती विकत घेतो आणि माझ्यावर टीका करणाच्या या मंडळींना वाटतो म्हणजे त्यांना घटनेची माहिती होईल असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी मारला.

माझे परमबंधू शिवेंद्रराजे यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना माझ्या विरोधात लढणार्‍या  नरेंद्र पाटलांना एवढी कडकडून मिठी का मारली होती त्यांना त्यांच्या मिशा आवडल्या होत्या का. आता लोकसभा निवडणूक झाली. माझा हात दगडाखालून निघाला. आता तोच दगड मी मारीन अशी भीती त्यांना वाटते आहे. पण त्यांनी मला ओळखलेले नाही. मला जर त्यांच्या विरोधात काही करायचे असते तर यापूर्वीच केले असते आणि यापुढेही करू शकतो. पण मी तसे त्यांच्या विरोधात करणार नाही, असेही उदयनराजे म्हणाले.

नवी दिल्‍ली येथे एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. नीरा-देवघरच्या प्रश्‍नावरून खा. उदयनराजे व रामराजे यांच्यात वाद पेटला आहे. मुंबई येथे शरद पवार यांच्यासमोरही या दोघांनी राजीनाम्याची भाषा केली होती. सातार्‍यात रामराजेंचा पुतळा दहन करण्यात आला तर या निषेधार्त फलटण बंद व रास्ता रोकोहीकरण्यात आला होता.

जिल्ह्यात आ. मकरंद पाटील काही बोलत नाहीत; हेच का बोलतात
माझ्या जिल्ह्यातील आ. मकरंद पाटील काही बोलत नाहीत. फक्‍त शिवेंद्रराजे आणि रामराजे बोलत आहेत. माझ्यावर आरोप करत आहेत. माझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार फक्‍त शरद पवार यांना आहे. तेच फक्‍त माझ्याबाबतीत बोलू शकतात, असेही खा. उदयनराजे म्हणाले.