शहरातील १७ केंद्रांवर रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडली. या परीक्षेला ६ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. ५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे सांगण्यात आले. पहिल्यांदाच या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला होता. पूर्वी दीडशे गुणांसाठी ही परीक्षा घेतली जात असे. या वर्षी १०० गुणांसाठी एक तास असे परीक्षेचे स्वरूप होते.
गणित या विषयाला पर्याय म्हणून माहिती व तंत्रज्ञान हा विषय देण्यात आला होता. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित असणाऱ्या प्रश्नपत्रिकेतील उत्तर चुकले की, गुण कमी केले जातात. दीडशे प्रश्नांसाठी ३०० गुणांची परीक्षा पूर्वी होत असे. या वेळी मात्र बदल करण्यात आले होते. शहरातील १७ केंद्रांवर सकाळी ११ ते १२ या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. ती सुरळीत पार पडल्याचा दावा करण्यात आला.