राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या या सर्व धामधुमीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्याचं समोर आलं आहे. मंत्रालयात आलेल्या या पत्राने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये नांदेडमधील संतोष कदम या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यलयाला शुक्रवारी संतोष कदमच्या नावाने एक पत्र मिळालं. या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते. या धमकीच्या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणी ज्या संतोष कदम या २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने याच्याशी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले आहे. आत्तापर्यंत काय घडले ५ ऑक्टोबर रोजी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र अधिकाऱ्यांच्या हाती लागले. हे पत्र नांदेडमधील काँग्रेसचा कार्यकर्ता असणाऱ्या २७ वर्षीय संतोष कदम याने पाठवल्याची माहिती समोर आली. या पत्रात सध्या राज्यातील बेरोजगारीसाठी राज्यसरकारची आर्थिक धोरणे जबाबदार आहेत असा आरोप करण्यात आला होता. तसेच कोणत्याही भाजपा कार्यकर्त्याने आमच्या गावात येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना ठार करु अशी धमकी या पत्रातून देण्यात आल्याचे समजते. संतोषची सही असलेल्या या पत्रामध्ये सरकार राजकारण्यांना ईडीची भिती दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. "तुम्ही ईडी आणि सीबीआयची भिती दाखवून पक्ष फोडले. त्या पक्षातील नेत्यांना पदांचे आमिष दाखवून आपल्या पक्षात घेतले. मला हे आवडलेले नाही. तुमच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्यामध्ये मंदी आली आहे. तुमचे भाजपाचे कार्यकर्ते आमच्या गावात दिसले तर मी तुम्हाला मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यामध्ये घुसून ठार मारेन," असं संतोषच्या नावाने मंत्रालयात पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते. हे पत्र हाती लागताच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र पोलिस महासंचालकांना दिली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले. त्यानुसार मरिन ड्राइव्ह पोलीस स्थानकांमध्ये संतोष विरोधात कलम ५०६ नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दुसरी बाजू मात्र या प्रकरणी संतोषशी 'मीड डे' या वृत्तपत्राने संपर्क साधला त्यावेळी वेगळाच दावा त्याने केला. २७ वर्षीय संतोष याने सध्या स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले आहे. या पत्रासंदर्भात संतोषकडे चौकशी केली असता त्याने 'याबद्दल तीन महिन्यापासून अनेकदा माझी चौकशी पोलिसांनी केली आहे,' असं सांगितलं. संतोषने वयाच्या २१ व्या वर्षी सक्रीय राजकारणामध्ये उडी घेतली. तो सहा वर्ष राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा (एनएसयूआय) सदस्य होता. "पक्षसाठी काम करताना मी माझे एमए आणि बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र राजकारणामध्ये माझे मन न रमल्याने मी दोन वर्षापूर्वीच राजकारणामधून बाहेर पडलो. त्यानंतर मी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरु केली," असं संतोष सांगतो. २८ जून रोजी मला विमानतळ पोलीसांनी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी माझ्या नावाने टाइप केलेले एक पत्र मिळाल्याची माहिती मला दिली. "मात्र या पत्राशी माझा काहीही संबंध नसल्याचे मी त्यांना सांगितलं. त्यांनी केलेल्या चौकशीमध्येही काहीच सिद्ध झाले नाही. कोणीतरी माझ्या नावे हे पत्र पाठवले होते. कोणीतरी हे मुद्दामून केले असल्याची शक्यता आहे," असं संतोषने सांगितले. "ही चौकशी झाल्यानंतर अगदी काही दिवसांमध्ये भाग्यानगर पोलीस स्थानकामधून मला फोन आला आणि माझ्याविरोधात महिलांची छेड काढल्याचा आरोप करण्यात आल्याचे मला सांगण्यात आले. पोलीसांनी चौकशी केल्यानंतर अशी कोणतीच महिला अस्तित्वात नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतरही अशा आरोपांचे सत्र थांबलेले नाही. बलात्कार, खंडणी आणि अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचे आरोप माझ्यावर करण्यात आले," असं संतोष सांगतो. या प्रकरणामुळे कदम कुटुंबियांनाही खूप त्रास झाला आहे. 'आता मी चौकशीशिवाय इतर गोष्टींसाठी घराबाहेर पडत नाही,' असं संतोष सांगतो. 'या प्रकरणामध्ये आम्ही या तरुणाची अनेकदा चौकशी केली असून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. प्रथमदर्शी कोणीतरी या तरुणाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात या तरुणानेही शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार दाखल केली आहे,' अशी माहिती नांदेड शहराचे उप-अधीक्षक अभिजीत फसके यांनी 'मिड डे'शी बोलताना दिली.