मुंबई - गोवा महामार्गावर लांजा तालुक्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिल व सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. तर सात जण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई - गोवा महामार्गावर वाकेडघाटीजवळ भरधाव कारने ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमधील प्रवासी हे मुंबईहून राजापूरला जात होते. राजापूर ५० किलोमीटर अंतरावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील मृत प्रवासी हे राजापूर कोंड्ये गावचे रहिवासी होते. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियंका उपळकर (वय २९), पंकज घाणेकर (वय १९), भार्गवी माजळकर (वय सहा महिने), मानसी माजळकर (वय ३०) अशी या मृतांची नावे आहे. तर एका मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. गणेश उपळकर (वय २६), लहू उपळकर (वय १८), अंकूश उपळकर (वय १८), हनुमंत शंकर भाजळकर (वय ३५, बसचालक), नितीन शांताराम जाधव (वय ३४), संदेश शंकर कांबळे (वय २१, क्लीनर), प्रमोद प्रभाकर माजळकर अशी जखमींची नावे आहेत.