काय रे अलिबागवरुन आलास का ? या डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एखाद्या व्यक्तीला हिणवताना काय रे अलिबागवरुन आला आहेस का ? या वाक्याचा अनेकदा वापर केला जातो. काही चित्रपट, मालिकांमध्येही हा डायलॉग ऐकायला मिळतो. हा डायलॉग किंवा वाक्य वापरत अलिबागकरांचा अपमान का केला जात आहे ? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. अलिबागचे रहिवासी असणाऱ्या राजेंद्र ठाकूर यांनी ही याचिका केली होती.

याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने समाजातील सर्व स्तरांवरील आणि समुदायाच्या लोकांवर विनोद होत असतात. त्यांना मनावर न घेता, केवळ आनदं घ्या अशी समजही याचिकाकर्त्यांना दिली.

काय रे अलिबागवरुन आलास का ? या डायलॉगवर बंदी आणा, उच्च न्यायालयात याचिका

राजेंद्र ठाकूर यांनी आपल्या याचिकेतून सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काहीतरी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी केली होती. तसंच चित्रपट आणि मालिकांमध्ये असा डायलॉग किंवा उल्लेख असल्यास सेन्सॉर बोर्डाने तो काढून टाकावा असा आदेश देण्याचीही मागणी करण्यात आली होती. अलिबाग म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ असून या डायलॉगमुळे विनाकारण अलिबागची बदनामी होत असल्याचं राजेंद्र ठाकूर यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं.