IPL 2020 FINAL: IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

मुंबईला मिळालेल्या विजेतेपदानंतर त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत मुंबईच्या संघाचं कौतुक केलं. “…आणि पुन्हा एकदा आमची मुंबई इंडियन्स विजयी झाली. पाचव्यांदा IPLचा चषक उंचावल्याबद्दल संपूर्ण संघाचं मनापासून अभिनंदन! रोहित… तू खरंच एक उत्तम कर्णधार आहेस. आम्हाला तुझा अभिमान वाटतो”, असं ट्विट फडणवीस यांनी केलं.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.