लोणावळ्यात प्रचंड वाहतूक कोंडी
सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारी पर्यटकांची वर्दळ होती. त्यातच द्रुतगतीवर दरड पडल्याने सर्व वाहतूक लोणावळ्यातून वळविण्यात आल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होऊन २४ तासही उलटत नाहीत तोच शनिवारी दुपारी खंडाळा बोगद्याच्या तोंडाजवळ पुन्हा दरड कोसळली. डोंगरावरील काही सुटे झालेले दगड व माती द्रुतगती मार्गाच्या पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोसळल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. २२ जुलैनंतर अवघ्या आठ दिवसांच्या अंतराने दरड कोसळण्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
द्रुतगती मार्गावर १९ जून रोजी खंडाळा बोगद्याजवळ दरड पडल्याने ३३ तास, तर २२ जुल रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कारवर पडल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू होऊन वाहतूक ठप्प झाली होती. या घटनांची दखल घेत रस्ते विकास महामंडळाने खंडाळा व खोपोली घाटाची पाहणी करत धोकादायक दरडी काढण्याचे काम २३ जुलै रोजी हाती घेतले होते. दरम्यान, दरड कोसळल्याची माहिती मिळताच तासाभरात मदत यंत्रणांनी रस्त्यावर पडलेले दगड-माती दूर केले. परंतु सुरक्षेच्या कारणासाठी द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करून ती राष्ट्रीय महामार्गाने लोणावळा खंडाळा शहरातून बोरघाटातील अंडा पॉइंट येथे पुन्हा द्रुतगतीला जोडण्यात आली.