जिल्ह्य़ात दुष्काळी परिस्थितीत भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शांतिलाल मुथ्था यांनी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे कार्य निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
बीड जिल्ह्य़ातील डोंगरकिन्ही येथील तलावातील गाळ काढण्याच्या भारतीय जैन संघटनेच्या कामास मंगळवारी (दि. २८) रात्री खासदार मुंडे यांनी भेट दिली. यावेळी विजय बंब, नितीन कोटेचा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, किशोर पगारिया आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार मुंडे म्हणाले, जिल्ह्य़ात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. मात्र, शासनाने निधी देण्यास दिरंगाई केली. औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केल्यामुळे दुष्काळी भागासाठी १२ कोटींचा निधी मिळाला. शांतीलाल मुथ्था यांनी दुष्काळी जनतेला मदत करण्यासाठी कार्य हाती घेतले आहे. मुथ्था यांच्या प्रयत्नांमुळे तलावातील गाळ उपसण्याचे काम तडीस जात असल्याचेही खासदार मुंडे यांनी सांगितले.