किराणा दुकान टाकण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणी परतूर तालुक्यातील चांगतपुरी गावातील अर्जुन पवार व अन्य चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
माजलगाव तालुक्यातील मंगरुळ येथील या विवाहितेची आई गंगाबाई गायकवाड यांनी फिर्याद दिली. मुलगी सुमित्रा हिचा १० वर्षांपूर्वी चांगतपुरी येथील अर्जुन पवार याच्याशी विवाह झाला. तिला तीन अपत्ये आहेत. सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी तिचा नेहमी छळ होत होता. रक्षाबंधनासाठी माहेरी आली असताना किराणा दुकान टाकण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींनी केली होती. पैसे न आणताच परतल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा चाकूचे वार करून खून केल्याचा आरोप सुमित्राच्या आईने फिर्यादीत केला. या प्रकरणी आष्टी पोलिसांनी सुमित्राचा पती अर्जुन, सासू, दीर, नणंद इत्यादी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.