नगर जिल्ह्य़ातील संतापजनक घटना
सासूलाही अटक
मुलगाच हवा तसेच कर्ज फेडण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आणावेत, या कारणातून पत्नी व दोन लहान मुली अशा तिघींचा गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना डोंगरगण (ता. नगर) या तीर्थक्षेत्राच्या गावात शुक्रवारी पहाटे घडली. पोलिसांनी गणेश मारुती भूतकर (वय ३०) व त्याची आई लक्ष्मी मारुती भूतकर (६०) या दोघांना अटक केली आहे.
अनिता (वय २६) हिला ज्ञानेश्वरी (५) आणि संजीवनी (३) या दोन मुलीच होत्या. अनिताला मुलगा नाही, दोन्ही मुलीच झाल्या यावरून, तसेच शेतीसाठी माहरेहून १ लाख रुपये आणावेत या कारणासाठी पती गणेश तसेच तिची सासू तिचा छळ करीत होते.
शुक्रवारी पहाटे या छळाची परिसीमा झाली आणि क्रूरकर्मा गणेशने या तिघींचा गळा आवळून खून केला. अनिताचा भाऊ देवीदास भास्कर तांबे (रा. उंबरे, राहुरी) यांनी एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली.  
या घटनेमुळे संतप्त झालेल्या अनिताच्या माहेरच्या लोकांनी तिघींच्या पार्थिवावर भूतकर यांच्या घरासमोरच अंत्यविधी केला.
भूतकर कुटुंब शेतकरी आहे.  डोंगरगणपासून साधारण एक किमी अंतरावर त्यांची वस्ती आहे. सहायक निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे तीन ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली.