मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे. सुडबुद्धीतून आणि राजकीय द्वेष पसरवण्यासाठी भाजपाची लोकं मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. वर्षभरापूर्वी आणि त्याआधी पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना का सुचली नाही याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

मदरशांमधील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी हे विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रतिमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. ही योजना बर्‍याच काळापासून राज्यात सुरू आहे. भाजपाचे सरकार असताना ही योजना सुरूच होती आणि आता भाजपचे लोक अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत हे कितपत योग्य असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपाची मंडळी राजकीय दृष्टीकोन ठेवून ही मागणी करत आहेत. त्यांच्या काळात हज का बंद केले नाही याचं आत्मचिंतन करावं आणि मग अशा प्रकारची मागणी करावी असे आव्हान राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.