दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झालं आहे. दरम्यान, जखमींवर हडपसरमधील नोबेल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरवरून आळंदीला जात असताना त्याला आज सकाळी अपघात झाला. ही पालखी दिवेघाटात असताने जेसीबी अचानक या पालखीत घुसली. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी अशी निधन झालेल्यांची नावं आहेत. दरम्यान, जेसीबीचे ब्रेक यापूर्वीच निकामी झाले होते. तसंच चालकाला वाहन उतरवू नये अशी विनंतीही करण्यात आली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी राहुल भीमराव बंडगर यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली. दरम्यान, सोपान महाराज नामदास यांच्यावर आळंदी येथे सायंकाळी ६ वाजता अंत्यविधी होणार आहेत.

सर्व वारकरी चहापानासाठी एका ठिकाणी थांबले होते. त्याच ठिकाणी हा काही अंतरावर हा जेसीबी होता. जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती समजल्यानंतर चालकाला आम्ही उतारावरून वाहन आणू नका अशी विनंती केली होती. परंतु अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी सुरू केला. उतारावरून येत असताना त्यानं पहिले एका रिक्षाला धडक दिली आणि त्यानंतर काही वारकरी हे जेसीबी खाली आले. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले असल्याचेही ते म्हणाले.