देशभक्ती आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी तरुणाईला दिला. कुडाळ येथे आमदार वैभव नाईक राज्यस्तरीय कबड्डी चषक स्पर्धास्थळी अभिनेता नाना पाटेकर यांनी भेट दिली. त्या वेळी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या कामाचे कौतुक केले.
आमदार वैभव नाईक कबड्डी चषक स्पर्धा सुरू असतानाच प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत स्पर्धास्थळी येताच सर्वच चाहत्यांनी गराडा घातला. त्यांनी सर्वाना देशभक्ती व सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कामाचे कौतुक नाना पाटेकर यांनी करून अशा काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी सर्वानी राहावे. जेव्हा काम होणार नाही तेव्हा साथ सोडा, पण तशी वेळ येणार नाही, असे नाना पाटेकर म्हणाला. नटसम्राटाच्या भूमिकेत जाताना नाना पाटेकर म्हणाला, टू बी ऑर नॉट टू बी.. जगावं की मरावं हा एकच प्रश्न, या नटसम्राटमधील संवादाने उपस्थितांना नाना पाटेकर यांनी भुरळ घातली.
सावंतवाडीसारखाच कुडाळचा विकास करण्यासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सांगत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना दिलासा दिला. अनेक वर्षे प्रलंबित असणारा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ४२ हजार हेक्टर जमीन वनसंस्था प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले. त्यासाठी आपण दिल्लीत जाऊन आल्याचे ते म्हणाले.
आमदार वैभव नाईक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते तत्पूर्वीच झाले होते. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, संदेश पारकर, भाजपचे प्रमोद जठार व मान्यवर उपस्थित होते.
आपण अभिनेत्री म्हणून कार्यरत असलो तरीदेखील आपण राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक खेळाडू आहे. आमच्या घरात खेळाचे बाळकडू मिळाले. त्यामुळे खेळात कष्ट घेणाऱ्या खेळाडूंचा मला अभिमान आहे, असे अभिनेत्री स्पृहा जोशी म्हणाल्या.
या वेळी उद्घाटनीय सामना विजय (मुंबई) व नंदिता सेवा संघ (मुंबई उपनगर) यांच्यात झाला. कुडाळला राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करून खेळाडूंचा गौरव केला आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी आमदार वैभव नाईक यांना सांगितले. आमदार नाईक यांची अष्टपैलू कामगिरी आयोजनात दिसत असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. या कबड्डी स्पर्धेत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांचे आगमन अचानकपणे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत झाले. त्यांनी दीपक केसरकर यांच्या कामाचे कौतुक केल्याने विरोधकांत चर्चेचा विषय बनला आहे.