जिल्ह्यात मी आणि पोलीस अधिक्षक असे दोनच गुंड असल्याचं वक्तव्य नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी केलं आहे. नुकताच त्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा निरोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात मी आणि पोलीस अधिक्षक असे दोनच गुंड असून या दोन गुंडांनी गुंडागर्दी केली नाही, तर दुसरे गुंडे तयार होतात असं म्हटलं. नेमकं काय म्हणाले ? “जिल्ह्यात केवळ दोनच गुंड असतात. एक म्हणजे जिल्हाधिकारी आणि दुसरा म्हणजे पोलीस अधीक्षक. या दोन गुंडांनी गुंडागर्दी केली नाही, तर दुसरे गुंड तयार होतात. त्यामुळे अशाचप्रकारे मी आणि पोलीस अधीक्षक आम्ही दोघे गाडीच्या दोन चाकांप्रमाणे हा जिल्हा चालवू.” दरम्यान काही दिवसांपूर्वी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मी काही हिरोपेक्षा कमी नाही असं म्हटलं होतं. एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे सध्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यांची चर्चा आहे.