शेतातील कामे आटोपून नदीच्या काठावरून घराकडे येत असलेल्या दोन बालकांचा नदीच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे घडली. तालुक्यातील बामणी येथील गजानन सोनाजी कदम (वय 16) व दीपक दत्तरामजी मुंगल (वय 15) हे दोघे दुपारी 12 वाजेच्या सुमारास नदी पलीकडील शेतात गेले. दिवसभर शेतातील कामे करून सायंकाळी परतत असताना नदीच्या काठावरील रस्त्यात गजानन कदम याचा अचानक पाय घसरल्याने तो नदीच्या पाण्यात पडला. तो पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी दीपक मुंगल याने पाण्यात उडी मारली. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावातील पोहणारे काही तरुण साहेबराव कदम, आनंद गाडगे, श्रीधर कदम, सुनील कदम हे तरुण नदीमध्ये उतरले आणि दोन तासाच्या शोधानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती अर्धापूर पोलिसांना देण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून रात्री उशिरा दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कोकरे हे करीत आहेत.