मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करण्यासंदर्भातील सुनावणीदरम्यान महाड प्रथम दंडाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यासाठी करण्यात आलेली अटक ही योग्य असल्याचं मत व्यक्त केलं मात्र त्यासाठी पोलीस कोठडी देऊन चौकशी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी राणेंची सात दिवसाची कोठडी द्यावी अशी मागणी केली होती.

न्यायालयाने २४ ऑगस्टच्या रात्री दिलेल्या निकालाच्या निर्णयाची आदेश प्रत आज म्हणजेच २५ ऑगस्ट रोजी समोर आली. “अटक करण्यात आल्याचं कारण आणि इतर कारणं ही अटकेच्या कारवाईसाठी योग्य आहेत असं मला वाटतं,” असं दंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी या आदेशात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> राणेंना ‘भोकं पडलेला फुगा’ म्हटल्याने भाजपाचा संताप; शिवसेनेला करुन दिली सत्तेत एकत्र असतानाची आठवण

राणेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या कलमांपैकी काही कलमांमध्ये जामीन मंजूर केला जात नसल्याचं निदर्शनास आणलं. या कलमांतर्गत आजीवन कारावास अथवा मृत्यूदंडाची तरतूद नाहीये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. मात्र आरोपीला जामीनावर सोडल्यास फिर्याद करणाऱ्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असं सांगत न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र त्याचवेळी आरोपीने पुन्हा अशाप्रकारचा गुन्हा करु नये असंही न्यायालयाने म्हटलं आहे. म्हणजेच राणेंनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन नये अशा आदेश न्यायालयाने दिलाय.

नक्की वाचा >> अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले…

१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात आशी वक्तव्य करणार नाही आशी हमी न्यायालयाने राणे यांच्याकडून लेखी कागदोपत्री लिहून घेतल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे पुणे, रायगड, नाशिक या ठिकाणी पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नारायण राणे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शेने करण्यात आली. राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक ठिकाणी तोडफोडी च्या घटना घडल्या. तसेच पोलिस ,भाजपा तसेच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

नक्की पाहा >> Video : मुख्यमंत्र्यांसारखीच चूक नितीन गडकरींनीही केली होती?

अटक आणि सुटका घटनाक्रम कसा?

नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची कोकण विभागीय जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चिपळूणहून संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे पोहोचली. तेथील गोळवलकर गुरुजी स्मारकामध्ये कार्यक्रम आटोपून अल्पोपहार सुरू असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आपल्या ताफ्यासह तिथे दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अटक होऊ  नये, अशी मागणी करणारा राणे यांचा अर्ज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जनआशीर्वाद यात्रेत स्वत: राणेंसह त्यांचे चिरंजीव नितेश, नीलेश, आमदार प्रसाद लाड, यात्रेचे कोकण विभागीयप्रमुख प्रमोद जठार इत्यादींनी कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रे दाखवण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करत तिथेच ठिय्या मांडला. अटक वॉरंट दाखवले नाही तर तिथून न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. अखेर पोलीस अधीक्षक गर्ग यांनी राणे यांची समजूत काढून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे महाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

नक्की वाचा >> राणेंच्या अटक आणि सुटका नाट्यावर नितेश राणेंची फिल्मी प्रतिक्रिया; रात्री ट्विट केला ‘हा’ व्हिडीओ

राणे यांना रात्री साडेआठच्या सुमारास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रथमवर्ग दंडाधिकारी बाबासाहेब शेखपाटील यांच्यापुढे  हजर करण्यात आले. यावेळी राणे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, राणे यांना अटक करण्यापूर्वी नोटीस दिली नाही, अटक चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणे यांची जामिनावर सुटका केली.