सरकार स्थापन करून महिनाभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. अजूनपर्यंत खाते वाटप झालेलं नाही. मंत्रालयात दालने घेतली व बंगले घेतले परंतु कारभार सुरू नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. खातेवाटपा अगोदरच राजीनामा देण्याची सुरूवात झाली आहे. हे सरकार अल्पकालावधीचं असुन ते दोन महिने देखील टिकेन की नाही, याबाबत शंका आहे, असं माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना एक टक्का देखील महाराष्ट्राच्या प्रशासनाचा अभ्यास नाही. त्यांचा कोणताही वचक नाही. त्यामळे ते या ठिकाणी खातेवाटप देखील करू शकलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देतो म्हणाले, जीआर काढला त्या जीआरमध्ये केव्हापासून कर्जमाफी देणार? ही तारीख नाही. याला जीआर म्हणत नाही, ही फसवाफसवी आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद न करता हे शेतकऱ्यांना पैसे कसे देणार? त्यामुळे हे फसवणुक करणारं सरकार आहे व अल्पकालावधीचं सरकार असल्याचे नारायण राणे यांनी एबीपीमाझाशी बोलताना सांगितले.

तीन पक्ष एकत्र येणं हे गणितच चुकलं आहे. या प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं वेगळी आहेत. हे तिन्ही पक्ष जनतेसाठी नाहीतर सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तसेच, ही शिवसेनेची सत्ता नाहीतर ही राष्ट्रवादीची सत्ता आहे. मंत्रिमंडळात काँग्रेस व शिवसेनेचं अस्तित्व देखील नाही. मुख्यमंत्री कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नाहीत, कॅबिनेट त्यांच्या घरातच आहे, असं देखील राणेंनी यावेळी म्हटलं.