नारायण राणे म्हणजे कोकणात आणि इतर सगळीकडेच संपलेले प्रकरण आहे. याला आम्ही आमच्या कोकणी भाषेत भानसुळ असे म्हणतो. नारायण राणे म्हणजे संपलेलं भानसुळ आहेत अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २४ डिसेंबरला पंढरपूरचा दौरा करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रामदास कदम हे पंढरपुरात आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राणेंचा उल्लेख भानसुळ असा केला. यावेळी रामदास कदम यांच्यासोबत सा. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आ. तानाजी सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे या सगळ्यांची उपस्थिती होती. याचवेळी मध्यंतरी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नारायण राणेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, त्याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणजे संपलेले भानसुळ आहे असे म्हणत त्यांनी फटाकरले. त्याचप्रमाणे दुधाच्या पिशवीवर बंदी घालणार नसून काही नियम आणि अटी घालून त्यावर नियंत्रण मिळवले जाईल असेही कदम यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ईव्हीएम मुळे भाजपाची सत्ता येते, असे कायमच बोलले जाते . याबाबत अनेक पक्षांनी आयोगाकडे तक्रारी केल्या. पण आयोगाला तक्रारीच ऐकून घ्यायच्या नसतील तर निश्चितच भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष आगामी काळात निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.