चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ बांधून तयार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.  ९ ऑक्टोबर २०२१ रोजी या विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते केलं जाणार आहे. त्या दिवसापासून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. सात वर्षे विमानतळ बांधून तयार होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच त्या दिवशीचा कार्यक्रमही जाहीर केला. “९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजचा चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. मी आणि ज्योतिरादित्य सिंधिया विमानाने मुंबईला येऊ आणि तिथून सिंधुदुर्गला जाणार आहोत. मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवणार का?, असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता ‘मुख्यमंत्री पाहीजेत असं नाही’, असं उत्तर त्यांनी दिलं. “क्रेडीट घेण्याचं प्रश्नच नाही. मी २०१४ सालापर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केलं. मी स्थानिक नाही का? आम्ही स्थानिक असल्याने आणि विमानतळ बांधल्याने आमचा अधिकार आहे. पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला. कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते हे माहिती नाही. मी संबंधित मंत्र्यांशी याबाबत बोललो आहे.”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.

“करोनाची तिसरी लाट आधीच आली आहे,” मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वी चिपी विमानतळावरून विमानाचं उड्डाण ७ ऑक्टोबरपासून होणार आहे, अशी घोषणा केली होती. सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या अडीच हजारात सुरु होईल, अशी माहितीही त्यांनी दिली होती. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नव्या तारखेची घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.