मोहन अटाळकर, अमरावती उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाण्यासाठी कमी अंतराचा पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊनही राजकीय इच्छाशक्तीअभावी त्याचे काम रेंगाळत चालले आहे. बडनेरा ते वाशीम हा केवळ १०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास दिल्ली ते बंगळुरू अंतर सुमारे ३२५ किलोमीटरने कमी होऊ शकेल. वेळ बचतीच्या या मार्गाच्या कामाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष अनेकांसाठी अनाकलनीय ठरले आहे. नरखेड-बडनेरा या रेल्वेमार्गाच्या वाशीमपर्यंतच्या विस्ताराच्या सर्वेक्षणानंतर या संदर्भातील अहवाल २०१५मध्ये रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता. या रेल्वेमार्गासाठी ५५९.६३ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या रेल्वेमार्गाचे दोन वेळा सर्वेक्षण होऊनही अद्याप मार्ग उभारणीच्या कामाला मंजुरी मिळू शकलेली नाही. हा रेल्वेमार्ग तयार झाल्यास कारंजा आणि मंगरूळपीर या दोन तालुक्यांची मुख्यालये आणि इतर नऊ गावे रेल्वेच्या नकाशावर येऊ शकतील. औद्योगिकदृष्टय़ा मागासलेला अशी ओळख असलेल्या या भागाच्या विकासाला मोठा हातभार लागू शकेल. दिल्लीहून बंगळुरूला जाण्यासाठी इटारसी, खंडवा, भुसावळ, दौंड, मीरज, वेल्लोर, बंगळुरू हा एक, तर इटारसी, आमला, नागपूर, बल्लारशा, विजयवाडा, तिरुपती, बंगळुरू हा दुसरा मार्ग आहे. इटारसी-खंडवा मार्गावरील वाहतूक नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे बंद पडल्यास इटारसी-नागपूर या मार्गाने उत्तरेकडे जावे लागते. उत्तर आणि दक्षिणेला जोडणारे हे दोनच मार्ग आहेत. त्यांना पर्यायी मार्ग असावा, या उद्देशाने बडनेरा-वाशीम मार्गाचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. नवी दिल्ली, इटारसी, नरखेड, बडनेरा, वाशीम, हिंगोली, लातूर, वाडी, गुंतकल, बंगळुरू असा पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. सध्या इटारसी ते नरखेड-बडनेरा हा रेल्वेमार्ग खुला झाला आहे. बडनेरा-वाशीम मार्गावर धनज येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा प्लान्ट आहे. ‘आयओसी’ने धनज ते बडनेरा रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. विशेष म्हणजे या रेल्वेमार्गाच्या उभारणीचा खर्च देण्याची तयारीही कंपनीने दर्शवली आहे. धनजपर्यंत हा रेल्वेमार्ग आल्यानंतर केवळ ७५ किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार करून रेल्वे विभागाला दिल्ली-बंगळुरूसाठी तिसरा पर्याय निर्माण करता येऊ शकेल. दुसरीकडे, नागपूरहून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठीचेही अंतर रेल्वेमार्गाने कमी होऊ शकणार आहे. सध्या नागपूर आणि अमरावतीहून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी नागपूर, अकोला, भुसावळ, मनमाड, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर, अकोला, वाशीम, परभणी, लातूर, कोल्हापूर तसेच नागपूर, सेवाग्राम, नांदेड, परभणी, पुणे हा तीन रेल्वेमार्ग उपलब्ध आहेत. मात्र बडनेरा-वाशिम रेल्वेमार्ग तयार झाल्यास या तीनही रेल्वेमार्गाच्या तुलनेत जवळपास ६० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. या नवीन रेल्वेमार्गामुळे विदर्भातील सहा, मराठवाडय़ातील सात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील चार अशा एकूण १७ जिल्ह्यांमधील दळणवळणाचे अंतर कमी होऊ शकेल. त्यामुळे वेळ आणि पैशांचीही बचत होऊ शकणार आहे. बडनेरा-वाशिम मार्ग अस्तित्वात आल्यास बंगळुरू, परभणी, पूर्णा, हिंगोली आणि वाशिम मार्गावरील कारखान्यांना कच्चा माल आणण्यास मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. बडनेरा ते वाशीम या रेल्वेमार्गावर लोणी, धनज, बेलखेड, कामरगाव, बांबर्डा, कारंजा लाड, पारवा, मंगरूळपीर, सायखेडा, टकमोर, पार्डी, महाली, कळंबा ही संभाव्य रेल्वेस्थानके आहेत. तीन दशकांची मागणी बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाची मागणी सुमारे तीन दशकांपासून केली जात आहे. विविध संघटनांनी त्यासाठी पाठपुरावा चालवला आहे. २००८ मध्ये या मार्गाचे पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, हा अहवाल नकारात्मक आला. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी झाली. २०१२ मध्ये पुन्हा सर्वेक्षण झाले. त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला, पण तो लालफितीत अडकला होता. आता पुन्हा या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. रेल्वेच्या सर्वेक्षण विभागाचे उपमुख्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या नेतृत्वातील पथकाने नुकतीच अमरावती, धनज, कारंजा, मंगरूळपीर आणि वाशिम येथे भेट दिली. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीला गती मिळू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील रेल्वेविषयक प्रश्नांवर त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. यात बडनेरा ते वाशीम या रेल्वेमार्गाच्या उभारणीचा विषय मांडण्यात आला. शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची मागणीही करण्यात आली. बडनेरा-वाशीम रेल्वे मार्गावर ११ संभाव्य स्थानके उभारली जाऊ शकतील. त्यामुळे या भागाचा विकास होऊ शकेल. या १०० किलोमीटरच्या रेल्वेमार्गामुळे दिल्ली ते बंगळुरू हे अंतर ४०० किलोमीटरने कमी होऊ शकेल. उत्तर आणि दक्षिणेला जोडणाऱ्या शहरांमधील दळणवळणाच्या खर्चात आणि वेळेत मोठी बचत होणार आहे. गोयल यांच्या सूचनेवरून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांच्या दालनात यासंदर्भात चर्चा झाली आहे. - नवनीत राणा, खासदार, अमरावती