उशीराने का होईना पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी त्यामुळे कोणताही फरक पडलेला नसून शनिवारी रात्री शहरात टोळक्याकडून पुन्हा एकाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर पोलिसांकडून तपासणी सुरू असतानाही हा खून करण्यापर्यंत टोळक्याची मजल गेल्याने पोलिसांना गुन्हेगार जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी रात्री पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात भावबंधन मंगल कार्यालयाजवळ पूर्ववैमनस्यातून संदीप कुमावत (३४, रा. अश्वमेघनगर, पेठरोड) या रिक्षा चालकाची आट ते दहा जणांच्या टोळक्याने हत्या केली. रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास कुमावत हा मोरे मळ्याकडे येत असताना त्यास टोळक्याने अडविले. कुमावतला दंडुक्याने मारत मारत भावबंधन मंगल कार्यालय परिसरात आणले.
दंडुक्यासह इतर शस्त्रास्त्रांचे वार करून कुमावतची हत्या करण्यात आली.