बुधवारी दिवसभर सर्वत्र चर्चा होती ती नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची. या दुर्घटनेमध्ये रुग्णालयातल्या २२ रुग्णांचा ऑक्सिजन अपुरा पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर या प्रकाराची चौकशी करण्यासाठी सरकारकडून उच्चस्तरीय समितीची नेमणूक सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नेमकी दुर्घटना घडली तेव्हा काय झालं, याविषयी राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

जिवावर उदार होऊन कर्मचाऱ्यांनी काम केलं!

यावेळी बोलताना प्रशासनाच्या आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. “या दुर्घटनेला ऑक्सिजन लीक होणं हेच कारण ठरलं आहे. पण त्यामध्ये देखील प्रशासन आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन काम केलं. ऑक्सिजन लीक झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात ऑक्सिजनचे व्हेपर्स झाले होते. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. तिथल्या लोकांनी तातडीने वॉल्व तोडून तो बंद केला. टाकीमध्ये उरलेला २५ टक्के ऑक्सिजन वाचवला. वेल्डिंग केली आणि पाऊण तासानंतर सगळं पुन्हा सुरू झालं”, असं राजेश टोपे म्हणाले. “सगळ्यांनी तत्परतेनं यात लक्ष घातलं आणि झालेलं लीकेज थांबवलं. लिक्विड ऑक्सिजन टँक पुन्हा भरला आणि पुढे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. पण ही घटना मनाला वेदना देणारी आणि दुर्दैवी आहे”, असं देखील ते म्हणाले.

कोण असणार उच्चस्तरीय समितीमध्ये?

दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होणार असून समितीमध्ये ७ सदस्यांचा समावेश असल्याची माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली. “या घटनेची उच्च स्तरीय चौकशी होणार आहे. या समितीमध्ये नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे अध्यक्ष असतील. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. पू. ना. गांडाळ हे सदस्य असतील. त्याशिवाय इथले सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉ. प्रमोज गुंजाळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव राठे, महानगर पालिकेचे अभियंता संदीप नलावडे, एफडीएच्या सहाय्यक संचालक माधुरी पवार आणि ऑक्सिजन प्लांट बसवण्याचं काम करणारे हर्षल पाटील हे या समितीचे सदस्य असतील”, असं ते म्हणाले.

मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी…; मुख्यमंत्र्यांचा भावनिक संदेश

मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून ५ लाख आणि नाशिक महापालिकेकडून ५ लाख अशी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली.