ठाणे जिल्ह्यातील उळ्हास नदीने शनिवारी धोक्याची पातळी ओलांडून बदलापूरसहीत कल्याणमधील ग्रामीण परिसर जलयम केला. याच पूराच्या पाण्यात बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस जवळजवळ १० तासांहून अधिक काळ अडकून पडली. लष्कर, नौदल आणि अन्य सरकारी यंत्रणा तसेच स्थानिकांच्या मदतीने या गाडीमध्ये अडकून पडलेल्या १ हजार ५० प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र आता एवढा पाऊस असताना ही गाडी बदलापूर स्थानकातून का सोडण्यात आली असा सवाल गाडीमधील काही प्रवाशांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना उपस्थित केला आहे. अचानक ही गाडी बदलापूर वांगणीदरम्यान कासगावजवळच कशी अडकली, याच भागात नदीचे पाणी रुळावर का आले यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहे. ट्विटवरील एका गुगल अर्थ आणि मॅप्ससंदर्भातील निरिक्षकाने नदीपात्रामध्ये भराव टाकून कृत्रिम बेटे तयार केल्याने नदी पात्रातील पाणी रुळांवर आल्याचे म्हटले आहे. आपल्या दाव्याचा पुरावा म्हणून या निरिक्षकाने महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेल्या भागाचे गुगल अर्थवरील २००३ चे आणि आताची भौगोलिक परिस्थिती दर्शवणारा नकाशाही पोस्ट केला आहे. तामिळनाडूमधील नागरकोल्ली येथील राज भगत यांनी महालक्ष्मी एक्सप्रेस कासगावजवळच कशी अडकली यासंदर्भात गुगल अर्थवरील तीन फोटोंसहीत एक शक्यता व्यक्त केली आहे. कासगावजवळ असणारा रेल्वे ट्रक हा उल्हास नदीच्या पात्राच्या अगदी जवळून जातो असं या नकाशामध्ये दिसते. पहिला नकाशा हा २००३ सालचा म्हणजेच १६ वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये रेल्वे रुळाच्या बाजूला असणारे उल्हास नदीचे पात्र अगदी मोठे दिसत आहे. तर दुसरा फोटो आताचा आहे. यामध्ये १६ वर्षापूर्वीच्या विस्तृत नदीपात्राऐवजी या नदीपात्रात भर टाकून तयार करण्यात आलेली जमीन दिसत आहे. भर टाकल्याने नदीपात्र अगदीच लहान झाल्याचे या फोटोंमधून स्पष्टपणे दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये सोळा वर्षांमध्ये नदी पात्रात किती भर टाकली आहे हे दाखवणारा फोटो राज यांनी पोस्ट केला आहे. 'प्रश्न: रेल्वेचा ट्रॅक अगदी नदीजवळ असेल आणि नदीच्या त्याच वळणाजवळ भर टाकून विकासाच्या नावाखाली कृत्रिम बेटे तयार केली तर काय होते? उत्तर: रेल्वे अडकते' असे ट्विट राज यांनी केले आहे. Q: What could go wrong when a rail track is too close to floodplains of a river which is taking a wicked turn where a natural island is altered for "development"? A: Train gets stranded#Map Red: #MahalakshmiExpress stranded location Orange:Altered island Black: Ulhas riverflow pic.twitter.com/lSLEpbEodP — Raj Bhagat Palanichamy (@rajbhagatt) July 27, 2019 राज यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी बरीच चर्चा केल्याचे या ट्विटखाली कमेंटमध्ये दिसून येत आहे. याच चर्चेमध्ये राज यांनी अजून एक मुद्दा मांडला आहे. 'गाडी जेथे अडकली तेथूनच थोड्या अंतरावर बंधारा आहे. या बंधाऱ्याचा नदीच्या प्रवाहावर किती परिणाम झाला आहे हे नीट सांगू शकत नाही पण सर्व सरकारी विभागांने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,' असं राज यांनी म्हटलं आहे. Adding to this, There's a barrage down stream little far away; Not sure how much it would have affected the flow. Entire section needs better and holistic planning! Various government arms need to talk to each other before doing anything on ground — Raj Bhagat Palanichamy (@rajbhagatt) July 27, 2019 मागील काही वर्षांमध्ये असे बदलले या परिसराचे भौगोलिक स्वरुप. Timelapse animation shows urbanization in the #Mumbai Metropolitan Region (Kalyan-Dombivli, Ulhas Nagar, #Badlapur section) between 1980s and 2018 Produced using @googleearth @EarthOutreach Requested by @janhavee pic.twitter.com/4bUteK4WBH — Raj Bhagat Palanichamy (@rajbhagatt) July 28, 2019 राज यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये ते भू-विज्ञान, रिमोट सेन्सींग तंत्रज्ञान, जलस्त्रोत, नगरविकास, पर्यावरण संदर्भात ट्विट करतात असं म्हटलं आहे. तसेच आपण जागतिक संसाधन संस्थेसोबत काम करत असल्याचे राज यांनी बायोमध्ये नमूद केले आहे. नक्की काय झाले बदलापूर आणि अंबरानथ स्थानकातील पाणी शनिवारी पहाटे अडीच तीनच्या सुमारास ओसरले. त्यानंतर बदलापूर स्थानकातून कर्जत लोकल रवाना झाली. ती व्यवस्थित कर्जतला पोहचली. ती सुरक्षित पोहोचल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेसच्याही मार्गात अडथळा नसेल असे समजून तिला मार्ग देण्याचा निर्णय रेल्वे यंत्रणेने घेतला. परंतु पुराचे पाणी रुळांवर आले आणि त्याची पातळी वाढली. पुढे जाण्यासाठी रेल्वेचा ट्रॅकच दिसत नसल्याने लोको पायलटला गाडी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती काही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर नेमके सत्य पुढे येईल असेही सांगण्यात येत आहे. यासंदर्भात 'लोकसत्ता'च्या प्रतिनिधींनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक एस. जैन यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनाही प्रतिसाद दिला नाही.