नक्षलवाद्यांनी आज(दि.१९) रविवारी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत रामको आणि शिल्पा या दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या. त्याविरोधात नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.

या बंदसाठी नक्षलवाद्यांनी एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली मार्गावर बॅनर लावले आहेत. दुर्गम भागात काही ठिकाणी लाल रंगाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी येत्या १९ मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील एटापल्ली-आलापल्ली मार्गवर झाडे तोडून मार्ग बंद केला आहे. गुरुपल्लीजवळ नक्षलवाद्यांनी झाड तोडल्यानंतर त्या ठिकाणी असलेली वनविभागाची लाखो रुपयांची लाकडे पेटवून दिली असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी रस्ता बंद केल्याने एटापल्लीहून आलापल्लीकडे जाणा-या बसेस एटापल्लीतच थांबल्या आहेत.

त्याशिवाय गुरुपल्लीजवळ वनविभागाची लाखो रुपयांची लाकडेही नक्षलवाद्यांनी जाळली आहेत. या पार्श्वभूमीवर काही वाहनांचीही जाळपोळ नक्षलवाद्यांकडून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या १ मेपासून जिल्हयात नक्षलवाद्यांनी सुरु केलेल्या हिंसक कारवाया आणि बंदचं आवाहन लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यासह तीन राज्याच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.