एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून भाजपासोबतची आपली ४० वर्षांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी जयंत पाटील, छगन भुजबळ, अनिल देशमुख यांच्यासहित अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर होते. खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार नाराज असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान अजित पवार यांनीही ट्विट करत अप्रत्यक्षपणे हा दावा खोडून काढला आहे. अजित पवार यांनी ट्विट करत एकनाथ खडसे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली असल्याचं म्हणाले आहेत. अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे". राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी @NCPspeaks पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे. — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2020 पुढे ते म्हणाले की, "खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो". खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. मा.खडसेसाहेब, मा.रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा,अनुभवाचा निश्चित सन्मान होईल,असा विश्वास देतो. — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2020 शरद पवार काय म्हणाले - एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर बोलताना शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसे यांच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काही तरी वेगळंच. मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत. असं आहे की, करोनाच्या संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड व्हेंटिलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना करोना झाला. त्यामुळे काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाही म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही".