“पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे, अशी विनंती करणार आहे” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ते दोन दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तुळजापूर दौऱ्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढण्याच्या विषयावर बोलताना, संपूर्ण कर्जाच ओझं राज्य सरकारला एकटयाला झेपेला का? असा मुद्दाही उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“आधी कधी आलं नाही, इतकं मोठं संकट राज्यावर आलं आहे. गावपातळीवर रस्ते खराब झाले आहेत. यामध्य मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. महाराष्ट्रावर ऐतिहासिक आर्थिक संकट आहे” असे शरद पवार म्हणाले. “अतिवृष्टीचा ऊसाला मोठा फटका बसला आहे. मोठया प्रमाणावर ऊस गाळपासाठी वापरता येणार नाही. सोयाबीनचही मोठं नुकसान झालंय” असे शरद पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा- मुख्यमंत्री बाहेर का पडत नाहीत? शरद पवार म्हणतात…

“अतिवृष्टीमुळं ग्रामीण भागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पिक घेतलं व ते गोळा केलं परंतु ते सगळं वाहून गेलं. अतिवृष्टीमुळं जमिनीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे” असं शरद पवार म्हणाले.

आणखी वाचा- कृषी विधेयकाला शेतकऱ्यांचा विरोध का? – शरद पवार सांगतात

“नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता आणण्यासाठी केंद्राकेड मागणी करणार आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन यावर मात करायला हवी. केंद्र व राज्य सरकार दोघांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा” असे शरद पवार म्हणाले.