कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवलं. त्याचप्रमाणे भाजपा महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात सांगतात की सरकार पाडण्याचा आमचा विचार नाही. मात्र ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न पडद्याआडून भाजपाकडून केला जातोय असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. CNN News 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. तीन पक्षांमध्ये थोडेफार मतभेद जरुर आहेत. मात्र भाजपाविरोधात आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आत्तापर्यंत मी मे महिन्यात हे सरकार पाडलं जाईल असं ऐकलं होतं. त्यानंतर जुलै महिन्याची मुदत देण्यात आली. आता ऑक्टोबरची मुदत दिली जाते आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी हरकत नाही- शरद पवार

करोनाचं संकट फक्त महाराष्ट्र किंवा भारतावर नाही
करोनाचं संकट हे फक्त भारतावर किंवा महाराष्ट्रावर आलेलं नाही. हे संकट संपूर्ण जगावर आलं आहे. अमेरिकेत जे काही बळी गेले आहेत त्यापेक्षा भारतातलं प्रमाण नक्कीच कमी आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होतो आहे अशी जी काही टीका होते ती योग्य नाही. मुंबई हे देशाचं मुख्य केंद्र आहे. तिथे बाहेरून येणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. तिथून हा करोना पसरला. ठाणे, पुणे या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे विरोधकांचं म्हणणं मला पटत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.