पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सुरू झालेली इंधन दरवाढ अद्याप कायम आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये जून महिन्यातील १६वी दरवाढ नोंदवण्यात आली. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे आणि करोनाकाळातील लॉकडाऊनमुळे जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक ओरंगाबादसह महत्त्वाच्या शहरात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने इंधन दरवाढावरुन केंद्रासह राज्यातील विरोधी पक्षनेत्यांवर टीका केली आहे.

मंगळवारी मुंबईसह ६ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ३४ पैसे, तर डिझेल लिटरमागे ३० पैशांनी वाढले आहेत यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने याची आकडेवारी ट्विट केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. आज जून महिन्यातील १६ वी दरवाढ नोंदविण्यात आली. पेट्रोलच्या दरात प्रती लिटर ३५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रती लिटर २८ पैशांची दरवाढ करण्यात आली आहे असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

इंधन दरवाढीवर उर्जामंत्री म्हणाले, “सायकल चालवा, आरोग्य सुधारा”

“या नव्या दरवाढीमुळे मुंबईत आता पेट्रोलचे दर प्रती लिटर १०४.९० रुपये झाले असून डिझेलचा दर प्रती लिटर ९६.७२ रुपयांवर पोहचला आहे. पेट्रोलने शंभरी पार केली असताना डिझेलचे दरही मागे न राहता आता शंभरीच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागतेय. सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले असतानाही केंद्रकडून कोणताही दिलासा दिला जात नसल्याचे चित्र आहे. राज्यातील विरोधी पक्षदेखील या महत्त्वाच्या प्रश्नावर आवाज न उचलता भावनिक मुद्द्यांचे राजकारण करण्यात व्यस्त आहे,” असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

इंधन दरवाढीप्रकरणी केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा दाखल; कट रचल्यामुळे किंमती वाढल्याचा आरोप

पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर ४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली. तेव्हापासून पेट्रोल ८.४० आणि डिझेल ८.४७ रुपयांनी महाग झाले आहे. देशातील मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूरू, नाशिक, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोल शंभर रुपयांपेक्षा जास्त दराने विकलं जात आहे.