पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. फक्त विरोधकच नाही तर सर्वसामान्यांकडूनही याप्रकरणी रोष व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी टीका करताना भाजपने रायगडावर जाऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागितली पाहिजे असं म्हटलं आहे. "भाजपाच्या कार्यकर्त्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत असून ते सर्वांच्या रक्तात आहेत. आमच्या महाराजांची तुलना मोदींसोबत करुन भाजपाने त्यांना सुरुवातीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांप्रती किती घृणा आहे हे दाखवलं आहे," असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने कधीही महाराजांचा अपमान सहन केलेला नाही. पण आता सहनशक्तीच्या पलीकडे चाललं आहे," असा इशाराही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यास जनता तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही असंही ते म्हणाले आहेत. याआधी धनंजय मुंडे यांनी ट्विट करतही आपला संताप व्यक्त केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही”. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. pic.twitter.com/vB7AjieBcI — Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 12, 2020 आणखी वाचा - “राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान आणि राजा बदलतात. पण…”; अरविंद जगताप संतापले जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं रविवारी प्रकाशन करण्यात आलं. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.