राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द होण्यावरुन एकनाथ खडसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांनी यामागील कारण स्पष्ट केलं असून दौरा रद्द नाही तर स्थगित झाला असल्याची माहिती दिली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते. एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतरच्या या दौऱ्याचं राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व असल्याचं समजलं जात होतं. यानिमित्ताने एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. एबीपी माझाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

एकनाथ खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शरद पवारांच्या दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने परवानगी देण्यास नकार दिला. मोठ्या प्रमाणात गर्दी होणं अडचणीचं ठरलं असतं. यामुळेच दौरा रद्द नाही तर स्थगित करण्यात आला आहे”.

शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलल्यानंतर भाजपामधील आपले कार्यकर्ते आणि असंतुष्ट नेते राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. भविष्यात खडसे जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक परिसरात भाजपाला मोठे आव्हान निर्माण करू शकत असल्याने सर्वांचंच या दौऱ्याकडे लक्ष लागलं होतं.