केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच सीरम इन्स्टिटय़ूटने महाराष्ट्राला लसच्या दीड कोटी मात्रा उपलब्ध करून दिल्या नाहीत असा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने तंबी दिली म्हणूनच सीरम कंपनीचे सीईओ अदर पूनावाला लंडनला निघून गेले असाही आरोप त्यांनी केला आहे. ते नगरमध्ये बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, “जे पहिल्या फळीत काम करत आहेत त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले पाहिजेत. केंद्राने लसींचं नियत्रंण आपल्या हातात घेण्याची गरज आहे. केंद्र सरकार ४५ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करणार आणि १८ ते ४४ वयोगटातील लोकांचं राज्यांनी करावं हे काही बरोबर नाही. आम्ही ग्लोबल टेंडर काढलं असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा हजार कोटी रुपये एकरकमी देण्याची तयारी केली. पण कोणतीही कंपनी आमच्यासोबत बोलण्यासाठी तयार नाही. केंद्र सरकारशी बोलू अस कंपन्या सांगत होत्या’. लसीकरणासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रीय धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचं हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.

अदर पूनावाला यांना सुरक्षा देण्याचा विचार करा

“सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीची घोषणा केल्यानंतर ग्लोंबर टेंडर काढलं. यावेळी काही कंपन्यांनी आम्ही तुमच्यासोबत नाही, तर केंद्र सरकारसोबत बोलू असं सांगितलं. पुण्यात असणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटने ज्याचे अदर पूनावाला सीईओ आहेत आणि शरद पवारांचे वर्गमित्र असणारे सायरस पूनावाला मालक आहेत…त्यांनी जूनपासून दीड कोटी लसी देण्याचं ठरवलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना केंद्राकडून तंबी देण्यात आली आणि ते बिचारे लंडनला जाऊन बसले”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “आपल्या राज्यात, पुण्यात तयार होणार नाही लसही दिली जात नाहीये. एकीकडे राज्यांना लसीकरण करायला लावायचं आणि दुसरीकडे लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नाही”. शरद पवार लवकरच सिरमला भेट देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सर्व कंपन्यांसाठी सारख्याच नियमांची ‘सीरम’ची मागणी

“पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी १८ ते ४४ वयोगटाच्या प्रमाणपत्रावर आपला फोटो छापून टाकला आहे. त्यामुळे आता ४५ वर्षांवरील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर मोदी आणि उर्वरित प्रमाणपत्रांवर ममतांचा फोटो आहे. मग आता आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचा फोटो छापू. चाललंय काय हेच कळत नाही,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.