पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. आज शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते. महाराष्ट्रातील शेतकरी कुठे होते ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिळवणूक ज्या विमा कंपन्यांनी केली आहे त्यावर तोडगा निघू शकतो.मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. परंतु सरकारची मर्जी दिसत नाही. दुर्दैवाने सत्तेतील एक पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेवून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात. रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे नसतात हे शिवसेनेला कुणी तरी सांगायची गरज आहे असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.