राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांनी प्रत्युत्तर देताना मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही अशा शब्दांत बोचरी टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं. आता त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देत मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही असं प्रत्युत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, “मी एकदा नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथकल्लीच सुरु केली आहे. अजून शंभरवेळा मी जाणार आहे. त्यानंतर माझा बापदेखील येईल. मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही”. गणेश नाईक यांच्या फिल्मी स्टाइल टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी, “मी स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी आग्र्यांची घरं तोडली जात होती तेव्हा तुम्ही काय करत होतात अशी विचारणा केली. वाढलेली गावठाणं सुरक्षित राहावीत यासाठी काय केलं? नव्या सीमा आखल्या पाहिजेत ते काही नाही केलं? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ठाणे जिल्ह्य़ात गणेश नाईक यांनी पक्ष संपवला असा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. त्यांनी मलाही संपवण्याचा डाव आखला होता, अशी टीकाही आव्हाड यांनी केली. नाईक यांच्यामुळे ठाणे- कल्याण- डोंबिवली- अंबरनाथ आदी शहरात पक्षाची ताकद संपली असे शरद पवार यांच्या निदर्शनास आणले होते. मात्र पवार यांचा माझ्यापेक्षा जास्त नाईक यांच्यावर विश्वास होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

गणेश नाईक यांनी काय उत्तर दिलं होतं ?
जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला गणेश नाईक यांनी “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं. “कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा,” असं गणेश नाईक यांनी आव्हाडांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितलं. गणेश नाईक यांनी यावेळी आपण मुलगा संदीप नाईकचा बळी दिला नसल्याचंही ते म्हणाले. “आपण संदीपला निवडणूक लढ म्हणून सांगितलं होतं, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे,” असं यावेळी गणेश नाईक यांनी सांगितलं.