राज्यात पुन्हा एकदा करोना संकट निर्माण झालं असल्याने अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसंच अभ्यासावर होत असून अनेकजण परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सध्याची करोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो”.


जितेंद्र आव्हाड यांनी हॅशटॅगमध्ये एमपीएससी परीक्षेचाही उल्लेख आहे. याआधी जेव्हा राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला होता. त्यामुळे राज्य सरकारने लगेचच परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. दरम्यान ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पहावं लागेल.

११ एप्रिलच्या एमपीएससी परीक्षेच्या तीन उपकेंद्रांत बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी (११ एप्रिल) होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यातील तीन परीक्षा उपकेंद्रे बदलण्यात आली आहेत. बदललेल्या परीक्षा केंद्रानुसार उमेदवारांना परीक्षापत्र उपलब्ध करून देत असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

परीक्षा दोन दिवसांवर येऊनही अद्याप वेळापत्रकाची प्रतीक्षा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे होणारी ऑनलाइन सत्र परीक्षा दोन दिवसांवर येऊनही अद्याप काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे वेळापत्रक नसताना परीक्षेची तयारी कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित के ला असून, तातडीने वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठातर्फे १० एप्रिलपासून पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत आहे. या परीक्षा पद्धतीची विद्यार्थ्यांना कल्पना येण्यासाठी ५ एप्रिलपासून सराव परीक्षाही घेण्यात येत आहे. मात्र काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने अभ्यासक्रमाची तयारी करता येत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.